गावागावातुन
मंचर बस स्थानकाचा कायापालट: ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी
माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बसस्थानक परिसर होणार चकाचक
मंचर (प्रतिनिधी):
आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंचर बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी घोषणा झाली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंचर बस स्थानकाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६’ अंतर्गत हे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.
मंजूर झालेली प्रमुख कामे आणि निधी:
मंचर बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारा चिखल व धुळीचा त्रास कायमचा संपवण्यासाठी खालील दोन महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत:
१. सिमेंट काँक्रीटीकरण: बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी १६ लाख २९ हजार ९७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानकाचा संपूर्ण परिसर सुसज्ज आणि स्वच्छ होणार आहे.
२.संरक्षक भिंत: स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला १९ लाख ९९ हजार ५८९ रुपये मंजूर झाले आहेत.
मंचर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या कामांसाठी विशेष निधी मिळावा म्हणून शासनाकडे आणि जिल्हा नियोजन समितीकडे विशेष आग्रह धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.
“मंचर बस स्थानकाचा परिसर सुसज्ज असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. या निधीमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
— दिलीपरावजी वळसे पाटील (माजी मंत्री तथा आमदार, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ)
गावागावातुन
रांजणी येथे भव्य रोजगार मेळावा; टाटा मोटर्सकडून ५५ युवकांना जागेवर नियुक्तीपत्र
रांजणी (ता. आंबेगाव) – स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रांजणी येथे शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका केतन वाघ आणि केतन वाघ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या मेळाव्यात देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनी टाटा मोटर्स सहभागी झाली होती. कंपनीकडून अरविंद काळे, गोवर्धन पांचाळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मुलाखत पथक उपस्थित राहून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.
या रोजगार मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना टाटा मोटर्सकडून जागेवरच नियुक्तीपत्र (जॉइनिंग लेटर) देण्यात आले. त्यामुळे अनेक युवकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
रांजणी व परिसरातील पंचक्रोशीत प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने स्थानिक युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात, जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात, तालुका कार्याध्यक्ष गणेश यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन वाघ यांनी उपस्थित मान्यवर, टाटा मोटर्सचे अधिकारी तसेच सहभागी युवक-युवती यांचे आभार मानले.
गावागावातुन
विठ्ठल बाळकृष्ण दरेकर यांचे निधन
आंबेगाव (प्रतिनिधी) : दरेकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ज्येष्ठ नागरिक कै. विठ्ठलराव (जनार्दन) बाळकृष्ण दरेकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
ते व्यावसायिक होते व शेतकऱ्यांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. दरेकरवाडी गावाच्या जडण-घडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. शांत, साधेपणा जपणारे आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
ते पत्रकार गिरीश दरेकर, उद्योजक अविनाश दरेकर, संतोष दरेकर व निलेश दरेकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता घोडनदीच्या पवित्र तीरावर, घोडगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे करण्यात येणार आहेत.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद
वळती प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.
मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक1 year agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
