सामाजिक
सुधारित सेवाव्रताची भूमिका कायम राहील: डॉ. सुजय विखे पाटील
नगर (प्रतिनिधी)
अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अकोळनेर येथे प्रतीक दादा युवा मंचच्या वतीने आयोजित या भव्य सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, “पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे.” असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले.

साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचा निर्धार
डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल”, असे स्पष्ट केले.
तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. तसेच “जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनात स्थान नाही.” असे देखील मत मांडून कठीण प्रसंगी साथ सोडणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला.
यासोबतच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विळदघाटात एमआयडीसी उभारून रोजगार निर्मितीचे आश्वासन देखील दिले. तसेच विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना त्यांनी म्हटलं की, लग्नात बुंदी वाटणे किंवा इतर किरकोळ कामं करणे हे लोकप्रतिनिधींचे काम नाही. लोकप्रतिनिधींचे मूळ काम म्हणजे रोजगार निर्माण करणे, महिलांना सुरक्षित ठेवणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे हे आहे, असून मत मांडून “मी ॲक्टिंग करणारा नेता नाही, मी माझ्या माझ्या कामातून बोलतो”, असे स्पष्ट करून जनतेला योग्य अपेक्षा ठेवण्याचे आवाहन केले व विकासाच्या दिशेने काम करण्याचे आश्वासनही डॉ. सुजय विखेंनी जनतेला दिले.
सामाजिक
शिवनेरी मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूंचा सहभाग; १५ फेब्रुवारीला शिवनेरी पायथ्याशी जल्लोष
जुन्नर, प्रतिनिधी –
शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्स व पोल्ट्री ब्रिडर्स कोऑर्डिनेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील ‘शिवनेरी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मॅरेथॉनचे चौथे वर्ष असून देश-विदेशातील तीन हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी होणार आहेत. केनियाच्या धावपटूंचा संघ हे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची माहिती शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी दिली.
५, १० व २१.१ किलोमीटर अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. शिवजयंतीच्या आदल्या रविवारी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनला यंदा उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला आहे. मोरडे फूड्स, वेकिज, शिवाई देवी मंदिर ट्रस्ट तसेच कुसूर, वडज, पारुंडे व काटेडे ग्रामपंचायतींसह आरोग्य विभाग, वन विभाग, तहसील कार्यालय, पोलिस प्रशासन, जुन्नर पंचायत समिती व नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
१५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून धावपटू शिवनेरी पायथ्याशी दाखल होण्यास सुरुवात करतील. झुंबा, पारंपरिक ढोल-झांज वादनाने वातावरण भारावून जाईल. सकाळी ६.१५ वाजता भगव्या झेंड्याने स्पर्धेला सुरुवात होईल. लोकनेते, वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी उपस्थित राहणार आहेत.
ऐतिहासिक परिसरातून स्पर्धा मार्ग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून स्पर्धेला प्रारंभ होऊन कुसूर–तलाखी–वडज–पारुंडे–काटेडे असा मार्ग असणार आहे. सर्व गटांच्या शर्यतींचा प्रारंभ व समारोप कुसूर येथील दत्त मंदिरासमोरील मैदानात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ज्या परिसरात गेले, त्या ऐतिहासिक व निसर्गरम्य वातावरणातून धावण्याची संधी सहभागी धावपटूंना मिळणार आहे.
धावपटूंना विविध सुविधा स्पर्धा मार्गावर झुंबा, पारंपरिक लोकवाद्य, नाश्ता, पाणी व एनर्जी ड्रिंक, द्राक्षे, संत्री, अंजीर, चिक्की आदी पोषणपूरक पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रथमोपचार, फिजिओथेरपी, कार्डियाक रुग्णवाहिका, फिरती शौचालये आदी सुविधा उपलब्ध असतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दुतर्फा मशालींच्या प्रकाशात उजळलेला स्पर्धामार्ग हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
शिवनेरीच्या पायथ्याशी होणाऱ्या या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शिवजयंती महोत्सवात यंदा क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.
गावागावातुन
“सेवाभावातून वयोवृद्धांना नवसंजीवनी..!” ब्राह्मणी येथे ‘वयोश्री योजना’ अंतर्गत आरोग्य तपासणी व मोफत सहाय्यक साधन शिबिर यशस्वी संपन्न..!
ब्राह्मणी (ता. राहुरी) : (प्रतिनिधी)
समाजसेवेचा अखंड ध्यास आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य व स्वावलंबनासाठीची बांधिलकी जपत, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर संचलित प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र यांच्या वतीने ‘वयोश्री योजना’ अंतर्गत दोन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी व सहाय्यक साधन वितरण शिबिर नुकतेच ब्राह्मणी येथे यशस्वीपणे पार पडले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार), अॅलिम्को, कानपूर आणि ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरादरम्यान एकूण ७२१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ते ‘वयोश्री योजना’चे पात्र लाभार्थी ठरले आहेत. या लाभार्थ्यांना व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा, मानपट्टा, काठी इत्यादी विविध सहाय्यक साधनांचे विनामूल्य वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या साधनांची एकूण अंदाजित किंमत ₹४७,१३,२३८ इतकी आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मा. खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र हे पुन्हा एकदा समाजसेवेचे आदर्श उदाहरण ठरले आहे. या केंद्रामार्फत दररोज अनेक वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सल्ला, वैद्यकीय मदत आणि सहाय्यक साधनांची सुविधा पुरविली जाते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत ब्राह्मणीचे सरपंच सुरेश मानकर तसेच अॅलिम्को, कानपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. या योजनेमुळे वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्वाभिमानाचे तेज पुन्हा झळकले.
“सेवाभावातून समाजसेवा” हे ब्रीद जपत,
डॉ. विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर यांनी
वयोवृद्ध नागरिकांसाठी पुन्हा एकदा
‘आशेचा किरण’ निर्माण केला आहे.
गावागावातुन
पारनेर, कान्हूर मंडळातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांना मागणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान न दिल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा
पारनेर : प्रतिनिधी
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”

निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके,जितेश सरडे,संदीप गाडेकर,योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर,चंद्रभान ठुबे,दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे,प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन, प्रशांत बोरुडे, हिरामण चेडे,शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार, प्रवीण थोरात, प्रशांत साळवे, राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे, प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड, सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन,दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक12 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
