Connect with us

गावागावातुन

उद्योगविश्वात ग्रामीण विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे ४० प्रशिक्षणार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवड

Published

on

Share

प्लेसमेंट म्हणजेच प्रगती – डॉ. विखे पाटील आयटीआयचा विश्वास वाढवणारा टप्पा”

नगर (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळाल्यास युवकही उद्योगजगतात आपला ठसा उमटवू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या एमआयडीसी, अहिल्यानगर येथील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) संस्थेतील विद्यार्थ्यांचे ताजे यश. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी सलग दोन दिवस झालेल्या कॅंपस मुलाखतींमध्ये आपल्या उत्कृष्ट कौशल्याने औद्योगिक क्षेत्रात यशस्वी प्रवेश करत संस्थेच्या गुणवत्तेची उजळणी केली आहे. या दोन्ही मुलाखतींमध्ये एकूण ४० प्रशिक्षणार्थ्यांची यशस्वी निवड झाल्यामुळे विद्यार्थी, पालक व संस्था परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

दि. ०३/०६/२०२५ रोजी एपिटोम कॉम्पोनंट्स प्रा. लि., सुपा एमआयडीसी या कंपनीसाठी फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी कॅंपस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण ९५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते, ज्यामधून ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

दि. ०५/०६/२०२५ रोजी Exide Industries Ltd., MIDC, अहिल्यानगर या देशातील अग्रगण्य कंपनीसाठी फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, एम.एम.व्ही. आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधून ११० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून ३३ प्रशिक्षणार्थ्यांनी यश मिळवले.

मुलाखतीपूर्वी संस्थेतर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रांमध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सादरीकरण कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि संवादकौशल्य मोठ्या आत्मविश्वासाने सादर केले. संस्थेतील शिक्षक, प्लेसमेंट अधिकारी आणि प्रशिक्षण समन्वयकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले.

ही निवड संस्थेच्या प्रगत कार्यशाळा, अनुभवी मार्गदर्शक, डिजिटल शिक्षण प्रणाली तसेच ऑन-द-जॉब ट्रेनिंग या सर्वांगीण उपक्रमांचे फलित मानले जात आहे.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले, “ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे, आणि हे यश त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

याप्रसंगी जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन मा. राधाकृष्ण विखे पाटील, डायरेक्टर जनरल डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) श्री. सुनील कोल्हापुरे, डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे प्राचार्य प्रा. ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. काकडे, गटनिदेशक श्री. पठारे, श्री. भुसे, व प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. अरुण म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांचे तसेच संपूर्ण आयटीआय टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ही निवड डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे नाव गौरवाने उजळवणारी ठरली असून, भविष्यातील अनेक प्रशिक्षणार्थ्यांसाठी ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल, याबाबत शंका नाही!

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी विशाल वाबळे

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खडकी ( ता. आंबेगाव) येथील विशाल वाबळे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे यांनी हे निवडीचे पत्र विशाल वाबळे यांना दिले .मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, दामु घोडे व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल वाबळे म्हटले की आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहचवणार असल्याचे विशाल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

विशाल वाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात ‌. विशाल वाबळे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरात उन अभिनंदन होत आहे.

Continue Reading

गावागावातुन

पारगावच महसूल कार्यालय मोजतोय अखेरच्या घटका

Published

on

Share

मंचर

आंबेगाव च्या पूर्व भागातील पारगाव कारखाना येथील तलाठी व महसूल मंडलाधिकारी कार्यालय शेवटच्या घटका मोजत आहे. दोन्ही कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्याने पारगाव जारकरवाडी तलाठी कार्यालय पारगाव ग्रामपंचायत खोलीमध्ये चालू आहे तर महसूल मंडलाधिकारी कार्यालय खाजगी जागेत चालू आहे. पूर्वीची इमारत चाळीस वर्षाहून अधिक झाली आहे. सदर इमारत जीर्ण स्वरूपाची झाली असून कौलारु इमारत आहे. या इमारतीला तडे गेले असून धोकादायक बनली आहे .


तलाठी सजेसाठी पारगाव जारकरवाडी ही गावे असून महसूल मंडलाधिकारी कार्यालयसाठी एकुण सतरा गावे आहेत त्यामध्ये पारगाव, जारकरवाडी, शिंगवे, वळती, भागडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंज नगर. ही गावे येत असल्याचे माहिती मिळत आहे. सदर इमारतीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

वळती : काटवानवस्तीत घरफोडी; एक लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

Published

on

Share


वळती, ता. २८

वळती येथील काटवानवस्तीत शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.ही घटना नकुबाई जयराम भोर (वय ८५) यांच्या घरी घडली असून त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहण्यास गेल्या होत्या.

घटनेचा तपशील असा आहे की, वळती गावाच्या पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटवनवस्तीत नकुबाई भोर यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतीचा खंड शेतकऱ्याने दिला होता. तो खंड रक्कम (रु. १,००,०००) नकुबाई भोर यांनी कपाटात ठेवला होता.

दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामहरी कोंडीभाऊ भोर व बबन जयराम भोर यांच्या घरांना बाहेरून कडी लावून टाकली. त्यानंतर नकुबाई भोर यांच्या घराचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून एक लाख रुपये रोख, पाकिटातील १५०० रुपये, तसेच दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची नथ, तीन तोळ्यांच्या चांदीच्या मासोळ्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

शनिवारी सकाळी सहा वाजता बबन भोर यांनी शेजारील शेतकरी रामहरी भोर यांना फोन करून घराच्या कडी उघडण्यास सांगितले. मात्र त्यांच्या घरालाही कडी लावलेली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गोविंद भोर यांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वळती गावाचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर सहायक फौजदार एस. आर. मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. गवारी व मोमीन यांनी घटनास्थळी भेट देऊन घरफोडीचा पंचनामा केला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending